Amazon

Friday, September 12, 2014

पु.लं.देशपांडे

माझ्याबद्दल अशी एक हकिगत सांगितली जाते
की, माझे लहानपण अत्यंत गरिबीत गेले.
खरे म्हणजे
गरिबीत वगैरे काही गेले नाही, पण आजच्याइतके ते
चांगल्या स्थितीत गेले नाही एवढे मात्र
निश्चित !

पण तेव्हाही आम्हांला आम्ही गरीब
आहोत ह्याची आठवण व्हायला फुरसत नसायची.
आज काय बालगंधर्वाचे गाणे आहे, पळा तिकडे !
उद्या काय सी.के.नायडूंची मॅच आहे, जा तिकडे. मग
कधी ती झाडांवर चढून बघ, तर
कधी दुसऱ्याच्या गच्चीवरुन ! (फुकट बघायला मिळते
म्हणून.) आमच्या पाठीमागे इतकी व्यवधाने असत
की आमच्या गरिबीचीसुद्धा आम्हांला आठवण
होत नसे.
ह्याबाबत टागोरांची एक कविता सांगतो.---एक
माणूस असतो. त्याच्या गळ्यात एक
लोखंडाची साखळी असते.
ती सोन्याची करण्यासाठी त्याला परीस
शोधायचा असतो. समुद्राच्या काठाने
जाताना तो सारखा दगड घ्यायचा,
साखळीला लावायचा आणि खाली टाकून
द्यायचा ! असे करता करता निराश होऊन खूप पुढे
गेल्यावर त्याने सहज साखळीला हात लावून
पाहिला तर ती केव्हाच
सोन्याची झालेली होती ! त्याच्या हातातून
परीस केव्हाच निसटून गेला होता.
तुमच्याही प्रत्येकाच्या हातात परीस आहे.
कोणाच्या हातात तो चित्रकलेच्या रुपात
आहे,कोणाच्या हातात संगीताच्या रुपाने ! फक्त
त्याकडे नीट बघावयास शिका. याबद्दल मला एक
उर्दू शेर आठवतो---"बगीच्यात फुलांचे ताटवे फुलले
आहेत, गुलाबाची फुले डुलत आहेत, पण त्यांकडे
बघण्यासच कोणी नाही."
------------------- पु.लं.देशपांडे

No comments:

Post a Comment