Amazon

Sunday, October 8, 2017

कुंदन शाह

कुंदन शाह ( १९ ऑक्टोबर १९४७ - ७ ऑक्टोबर २०१७ )


सकाळ पासुन कुंदन शहा यांची गेल्याची बातमी पहात होतो, इतर कलावंत जातात तसे वाटले आणि त्याप्रमाणे थोडेसेच वाईट वाटले. त्यानी नुक्कड़ , जाने भी दो यारो (film) या सारख्या कलाकृती केल्या त्या खुप प्रसिद्ध होत्या  त्या मी पाहिल्या नाहीत ( माझं दुर्दैव ) पण माझा सर्वात आवडता चित्रपट - 'कभी हाँ कभी ना' याचे writer , director  ते होते हे माहीत नव्हते ( माझं सर्वात मोठं दुर्दैव्य) या चित्रपटाशी माझा एक वेगळाच जिव्हाळा आहे म्हणून त्यांच्या विषयी कृतज्ञता म्हणून ही पोस्ट टाकण्याचा आटापीटा, ( जशी माहिती मिळाली तस मला राहवलच नाही) त्याचं कारण म्हणजे लहान असताना दूरदर्शन वर शुक्रवारी रात्री जागुन पाहिलेला हा सिनेमा .. जस जस वय वाढत गेलं तस तसे तो चित्रपट लैपटॉप मधील एका फोल्डर मधे कधी येऊन बसला माहीत नाही, 20-25 वेळा तो चित्रपट पाहिला असेल मी, अजूनही तो चित्रपट पाहिला की त्या काळतील लोकांविषयी खुप आदर वाटतो, त्या काळी लोक किती साधे सिंपल विचारांचे होते. तो चित्रपट पाहिला की त्या काळतील आठवण आल्याशिवाय राहत नाही. अजूनही youtube वर ' वो तो है अलबेला हजारों में अकेला ' गाण पहावसं वाटतं ( कित्येक वेळा पाहिलही आहे) माझ्या माहितीप्रमाणे तो शाहरुख़चा सर्वात बेस्ट परफॉरमेंस होता. आणि त्यांनी शाहरुख खानची या जगाला ओळख करून दिली. त्यानंतर शाहरुख़ कधी थांबलाच नाही. त्याचित्रपटाबद्दल खुप काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, त्याची एक स्वतंत्र पोस्ट तयार होऊ शकते. तुम्ही गेलात खरे पण तुमची कलाकृती ( कभी हां कभी ना) मधून नेहमीच सोबत असाल. तुमच्या निधना नंतर ही माहिती मला मिळावी हे माझं सर्वात मोठे दुर्दव्य. आमच्या काळतील पीढ़ी नेहमीच कृतज्ञ राहील. आताही त्या 90 च्या दशकात जायची इच्छा झाली तो चित्रपट पाहतो. आणि पाहत राहणार . 'कभी हां कभी ना' मधील ओळी तुमच्या साठी,

"ओ तो है अलबेला
हजारों में अकेला"

- Written date 8 October 2017

Monday, March 6, 2017

चार मिनिटांत युद्धखोरी..


मार्च १९१७. म्हणजे बरोबर १०० वर्षांपूर्वीची गोष्ट. शिकागोतला सॅडल अ‍ॅण्ड सायकल नावाचा क्लब. पोलाद कारखानदार डोनाल्ड एम रेयरसन, सिनेटर मेडील मॅककॉर्मिक असे काही प्रतिष्ठित नागरिक रात्रभोजनासाठी एकत्र जमले होते. गप्पा छान रंगात आल्या होत्या. विषय होता अर्थातच युद्धाचा. काँग्रेसमध्ये नुकतेच एक विधेयक मांडण्यात आले होते. सर्व नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देण्याबाबतचे. ही सर्व मंडळी देशभक्त. विधेयकाच्या बाजूची. काहीही करून ते विधेयक मंजूर झालेच पाहिजे असे त्यांचे मत होते. पण ते होणार कसे? त्या विधेयकाला जोरदार विरोध होता. तो मोडून काढायचा कसा? कोणी तरी सहज सुचवले – चित्रपटगृहांत बरेच लोक एकत्र येतात. आपण तिथे जाऊन भाषणे दिली तर?
रेयरसन यांना ही कल्पना अतिशय आवडली. सिनेटर मॅककॉर्मिक यांनीही ती उचलून धरली. पण भाषणे करणार कोण? अखेर ठरले, की देशभक्त वक्त्यांची संघटना तयार करायची. त्यांनी चित्रपटगृहांत जायचे. सिनेमाचे मध्यंतर होते, ती वेळ सोयीची. तेव्हा भाषण द्यायचे. चित्रपटगृहे हे तेव्हापासून या अशा राष्ट्रवाद्यांचे लाडके ठिकाण आहे म्हणायचे! मग प्रश्न आला, संघटनेच्या नावाचा. कोणी तरी म्हणाले, चित्रपटांची रिळे बदलायला प्रोजेक्शनिस्टला चार मिनिटे लागतात. त्या चार मिनिटांच्या मध्यंतरात बोलणाऱ्यांच्या संघटनेला म्हणावे – फोर मिनट मेन. सर्वानाच नाव आवडले. कारण या नावाचा संबंध केवळ अवधीशी नव्हता. तर तो होता अमेरिकी क्रांतियुद्धाशी.
अठराव्या शतकात ब्रिटिशांशी लढून अमेरिकेने स्वातंत्र्य मिळविले होते. त्या युद्धात अनेक सर्वसामान्य नागरिकांनीही भाग घेतला होता. एरवी सामान्य नागरी जीवन जगणाऱ्या अनेकांनी तर स्वत:च सैनिकी शिक्षण घेतले होते. नागरी शिलेदारच ते. वेळ येताच एका मिनिटात लढायला तयार होत असत. त्यावरून त्या शिलेदारांना नाव पडले मिनट मेन. देशभक्तीचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. फोर मिनट मेन या नावातून या संघटनेने त्या देशभक्तांशीच आपले नाते जुळवले. प्रोपगंडाशास्त्रातील ‘ग्लिटरिंग जनरॅलिटी’- चमकदार सामान्यता – या तंत्राचा हा उत्तम नमुना. एखाद्या आदर्श नैतिकतादर्शक शब्दाशी एखाद्या गोष्टीस वा व्यक्तीस जोडून घ्यायचे आणि त्यातून कोणत्याही पुराव्यांविना ती गोष्ट वा व्यक्ती तशीच आदर्श आहे हे लोकांना मान्य करायला, स्वीकारायला लावायाचे असे हे तंत्र. आपल्या बहुतेक राजकीय घोषणा – मग ती ‘गरिबी हटाओ’ ही घोषणा असो की जाहिराततज्ज्ञ पीयूष पांडे यांचे सहकारी अनुराग खंडेलवाल यांनी तयार केलेली ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ ही घोषणा असो – यात तंतोतंत बसतात. अशा घोषणा या अतिशय मोघम असाव्या लागतात. त्या मोघमपणामुळे प्रत्येकाच्या मनात त्याच्या त्याच्या कुवतीनुसार हवा तो, परंतु चांगलाच अर्थ निर्माण होत असतो. याचे आपल्याकडील दुसरे उदाहरण म्हणजे शिवसेना आणि मावळे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मावळे म्हणण्यातून जी सरंजामशाही भावना निर्माण होते, तिच्या आधारावर या पक्षाचे एकचालकानुवर्तीत्व भक्कम टिकून राहिले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांच्या मनातही मावळे म्हटल्यावर एक वेगळीच, लढाऊ  स्वातंत्र्ययोद्धय़ाची प्रतिमा तयार होत असते. ही ग्लिटरिंग जनरॅलिटी. फोर मिनट मेन या नावातून नेमका असाच परिणाम साधला जात होता. या नावाने ओळखले जाणारे वक्ते जे बोलतील ते देशहिताचेच असेल असा संदेश आपोआपच लोकांतच जात होता.
या संघटनेतर्फे ३१ मार्च १९१७ रोजी शिकागोतल्या स्ट्रॅण्ड थिएटरमध्ये पहिले भाषण झाले. वक्ते होते डोनाल्ड रेयरसन. १९१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘फोर मिनट मेन ऑफ शिकागो’ या ५५ पानी पुस्तिकेत या संघटनेचा इतिहास दिला आहे. त्यानुसार, स्थापनेनंतर काही दिवसांतच ही संघटना जॉर्ज क्रील यांच्या लोकमाहिती समितीचा भाग बनली. १६ जून १९१७ ते २४ डिसेंबर १९१८ हा या संघटनेचा काळ. अवघ्या अठरा महिन्यांचे आयुष्य. पण एवढय़ा कमी काळात या संघटनेच्या माध्यमातून ७५ हजार वक्त्यांनी अमेरिकेतल्या सात हजार ४४८ शहरांतील, गावांतील चित्रपटगृहे, चर्च, क्लब, कारखाने असे जेथे जेथे लोक एकत्र येतात अशा ठिकाणी जाऊन भाषणे दिली. त्या भाषणांची संख्या होती साडेसात लाखांहून अधिक. आणि ऐकणाऱ्या नागरिकांची संख्या होती ३१ कोटी ५० लाख. भाषणे कोठेही होवोत, त्यांचा वेळ मात्र चार मिनिटांचाच ठेवण्यात आला होता. याचे कारण, क्रील यांच्या मते चार मिनिटे एवढाच सर्वसामान्य अमेरिकी नागरिकाचा अवधान-काल होता. तेव्हा अवघ्या चार मिनिटांचीच ही भाषणे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील ‘कमर्शियल ब्रेक’सारखी. तेथेही ते युद्धच विकत असत. त्यांचे विषय असत – ‘आपण का लढत आहोत?’, ‘कोण आहेत आपले शत्रू?’, ‘जर्मन प्रोपगंडाचा पर्दाफाश’, ‘लोकशाहीला धोका’, येथपासून ‘अन्नबचत’, ‘लिबर्टी लोन’ येथपर्यंत. विविध भाषांतून, विविध समुदायांसमोर ती होत असत. अमेरिकी सरकारला हवी ती लोकभावना निर्माण करण्यास या फोर मिनट मेनचा चांगलाच उपयोग झाला. जॉर्ज क्रील यांनी लोकमाहिती समितीच्या कामावर ‘हाऊ  वुई अ‍ॅडव्हर्टाइज्ड अमेरिका’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात ‘ही संघटना अभिनवता आणि प्रभाव या दोन कारणांमुळे इतिहासात अजरामर होईल,’ अशा शब्दांत या समितीच्या कामाचा गौरव केला आहे. वरवर पाहता अतिशय साधी-सरळ कल्पना होती ती. वक्त्यांनी लोकांसमोर जायचे आणि बोलायचे. बस्स, एवढेच. पण या साधेपणातच तिच्या यशाचे रहस्य होते. प्रोपगंडाचा इतिहास पाहिला तर अशा साध्याच गोष्टी अत्यंत प्रभावशाली ठरल्याचे दिसते. हेच तंत्र पुढे अनेक प्रचारतज्ज्ञांनी वापरले. भारतातील याचे एक आधुनिक, परंतु काहीसे वेगळे उदाहरण म्हणजे ‘चाय पे चर्चा’. त्याची सविस्तर चर्चा सदरहू सदरात पुढे येईलच. फोर मिनट मेनच्या या साधेपणातही एक योजना होती. त्यातील पहिली बाब वक्त्यांची. त्यांची निवड स्थानिक समितीकडून केली जाई. पण त्यांनी काय बोलायचे, ते कसे बोलायचे हे मात्र सांगितले जाई केंद्रीय समितीकडून. क्रील समितीने जारी केलेल्या एका माहितीपत्रकातील एक सूचना पाहण्यासारखी आहे. ती म्हणजे- ‘तुमच्या देशाला तुमची आवश्यकता आहे यांसारखे वापरून गुळगुळीत झालेले वाक् प्रचार अजिबात वापरू नका.’ याचे कारण अशा शब्दांनी त्यांचा जोम गमावलेला असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे – ‘श्रोत्यांमधील अतिसामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला उद्देशून बोला. त्याच्यावरच्या सगळ्यांना आपोआपच तुमचे म्हणणे समजेल.’ यातून प्रोपगंडातील नावीन्याची आणि सामान्यतेची थोरवीच सांगितलेली आहे. आजच्या आपल्या थोर वक्त्यांची भाषणेही याहून वेगळी नसतात!
कोण असतात हे चार मिनिटांचे वक्ते? खुद्द चार्ली चॅप्लीन, मेरी पिकफर्ड यांसारख्या सेलिब्रेटी या संघटनेसाठी काम करीत होत्या. पण ही भाषणे करणारे सगळेच स्वयंसेवक-वक्ते काही हॉलीवूड वा वॉशिंग्टनहून आलेले नसत. ते स्थानिकच असत. युद्धावर जाण्याचे वय लोटलेले मध्यमवयीन पुरुष, वकील, धर्मोपदेशक, स्थानिक नेते अशांचा त्यात समावेश असे. त्यात महिलाच नव्हे, तर लहान मुलेही असत. बहुतेक सारे असत ते मात्र गोरे. ते बोलत ते त्यांना जे पढविले गेले तेच, परंतु भाषा त्यांची असे. ढब त्यांची असे. यातून सरकारचा प्रवक्ता आपल्याच भाषेत आपल्याशी संवाद साधत आहे आणि त्याच वेळी तो आपल्यातलाच आहे अशी दुहेरी भावना लोकमानसात निर्माण होत असे. त्यांच्या शाब्दिक अवडंबरातून सारेच लोक युद्धाच्या बाजूने असल्याचा समज आपोआपच तयार होत असे. अमेरिकेत अवघ्या काही महिन्यांत पराकोटीची युद्धखोर भावना दिसू लागली ती त्यामुळेच.
या भाषणांच्या जोडीने क्रील समितीने चित्रपटांचाही प्रोपगंडासाठी पद्धतशीर वापर केला. पुढे दुसऱ्या महायुद्धात नाझींनी ते तंत्र उचलले. आजही सर्रास त्याचा उपयोग केला जातो. हॉलीवूड तर त्यासाठी प्रसिद्ध आहे..

Thursday, February 2, 2017

धागा समूह आणि आनंदवन - हेमलकसा भेट

धागा समूह व आमचे वेगवेगळे  उपक्रम याबद्दल मी अगोदर लिहिले आहे. धागा समूहाशी मी कसा जोडला गेलो, वगैरे वगैरे..  सांगण्याच्या उद्देश हा कि हे खर तर  गेल्या वर्षी झालेल्या सोमनाथ श्रम संस्कार शिबीर २०१६  यामुळे धागा मधील कार्यकर्त्यांची ओळख झाली. हळू हळू जस जस एक एक उपक्रम राबवत होतो तस तशी मैत्री घट्ट होत गेली. त्यावेळी शिबिराला जाण्यासाठी मला फक्त ७ दिवसच सुट्टी मिळाली आणि शिबीर झाल्यावर आनंदवन संस्था तेथील उद्योग, लोक बिरादरी प्रकल्प -हेमलकसा पाहायची इच्छा होती पण सुट्टी नव्हती म्हणून शिबिरानंतर लगेच पुण्याला परतावे लागले. तेंव्हा पासून मनात होत कि,बाबा आमटे व त्यांचे कार्यकर्ते यांनी सुरु केलेले सर्व प्रकल्प पाहायचे आहेत. एका नंतर एक धागाचे उपक्रम चालू होते आणि अचानक जानेवारी मधे  लॉन्ग वीकएंड मिळाला, म्हणजे ४ दिवसाची सलग सुट्टी. आणि जानेवारीच्या सुरवातीपासूनच ठरले होते कि ह्या ४ दिवसात आनंदवन - हेमलकसा येथे भेट द्यायला जायचे आहे. शेवटी जायचा दिवस आला आणि ठरल्याप्रमाणे पाहिल्यादिवशी आनंदवन मधे पोचलो. फक्त भेट द्यायच्या उद्देशाने गेलो नव्हतो . हेमलकसा येथे वॉल पेंटिंग करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली होती. मुख्य उपक्रम वॉल पैंटिंग हा होता आणि या निमित्ताने आम्हाला संस्थेलाही भेट देण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागला नाही. 

आनंदवन ते हेमलकसा हे जवळपास ५ तासाचे अंतर आहे त्यामुळे, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून  ६ वाजता हेमलकसा कडे जायचे ठरले. सकाळी हेमल कसा साठी निघताना विकासभाऊंची ( डॉ विकास आमटे ) भेट झाली. त्यावेळी मनात विचार आला कि हे तेच आहेत ज्यांचे लोकसत्ता - लोकरंग मधे  ' संचिताचे कवडसे ' नावाचे आनंदवन याविषयी लेख येतात. मी ते दर वेळी वाचतो तशी मी बाबा आमटे आनंदवन विषयीची बरीचशी  पुस्तके वाचलेली आहेत. परंतु वाचनात नसलेले आणि विकास भाऊंनी अनुभवलेल्या जुन्या आठवणी किंवा प्रेरणा देणाऱ्या काही घटना त्या वाचायला मिळतात. आणि आयुष्य सरत असताना एक वेगळी दिशा मिळते किंवा असं होत कि कितीही मोठ्या आनंदाने डोक्यात हवा जात नाही, पाय जमिनीवरच राहतात आणि खूप असं दुःखही आले तरी मोडून पडत नाही, त्याचा सामना करण्यासाठी एक वेगळीच प्रेरणा आपल्या अंगात नकळत रुजली जाते. आणि गोष्टी साध्या सोप्या होऊन जातात. माझं त्यांच्याशी जास्त बोलणे नाही झाले. बोलण्यापेक्षा ऐकत राहण्यामधे मी विश्वास ठेवतो. शिबीरमधे  असतानाही एक भेट झाली होती, त्यावेळी काहीजण त्याच्या बरोबर फोटो काढण्यासाठी विचारणा करत होते. त्यावेळी त्यांचे ते वाक्य खूप आवडले, ते म्हणाले होते, - 'अरे माझा फोटो काय काढता.. सोमनाथ मधे जी घर बांधली आहेत, त्यांचे फोटो काढा, ती बांधलेली घरांची रचना कशी आहे ? ती का वेगळी आहेत ? ह्याची माहिती सर्वाना कळू द्या. त्यांच्या सहज बोलण्यातून अशा किती तरी गोष्टी समजून जातात. 

पहिल्या दिवशी आनंदवन पाहत असताना बाबा आमटे यांचा सहवास लाभलेले एक जुने गृहस्थ भेटले,  जुन्या लोकांना भेटायला,बोलायला खूप आवडतं कारण त्यांच्या कडे तसा अनुभवाचा खजिना असतो. त्यामुळे त्याचे अनुभव ऐकायला खूप आवडते. ते भेटलेले गृहस्थही थोड्या मिश्किल स्वभावाचे होते. तस मी नवीन कॅमेरा घेऊन पक्ष्याचे फोटो काढताना पाहिल्यावर त्यांनी मला सांगितले, कि आनंदवन मधे कुठले पक्षी कोणत्या वेळी कुठे येतात, म्हणून wildlife फोटोग्राफी साठी मार्गदर्शनही केले. त्यांनी बाबाचे , पु ल देशपांडे यांचे खूप अनुभव सांगितले. जाता जाता त्यांना म्हटले तुमचा पण एक फोटो द्या, तर त्यांनी मिश्किल पणे फोटोसाठी पोज दिली. आणि सांगितले फोटो खाली कॅपेंशन लिही -" कॉम्म्नाडर्स ऑफ बाबा आमटे" . 
    असे अनुभव किंवा एक दोन दिवसासाठी का होईना थोडेसे वेगळं जगणं,जगण्यात एक वेगळीच गोडी निर्माण करतं. अगदी दोन पायांच्या प्राण्यामधून बाहेर येऊन माणसात आल्यासारख वाटणं अस म्हणतात ते हेच.

आम्ही सर्वजण ( धागा समूह)  दुसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत हेमलकसा येथे पोचलो, फ्रेश झाल्या बरोबर  थोडा वेळ आराम करून पूर्ण प्रकल्प पहिला , Amte Animal Ark ( प्राण्यांचे अनाथालय) पाहायला मिळाले. त्याच्या विषयी सर्वाना माहिती आहे म्हणून मी जास्त लिहीणार नाही. प्रकल्प पाहत असताना आम्ही तेथील  निवासी शाळेकडे पोचलो बहुतेक मधली सुट्टी झालेली असावी, सर्व मुले वर्गातून मैदानातून बाहेर पडत असताना दिसत होती, त्यातील एकाने कुतूहलाने आणि निरागस पणे विचारले तुम्ही कुठून आला आहात? त्यांच्या त्या बोलण्यात खूप नम्रता होती.  नाहीतर कुठे कुणाला भेटलो तर खोडकर आणि हट्टीच मुले भेटायची. पण इथे चित्रच वेगळं होतं, आणि नंतर लक्षात आले कि यांचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नसल्याने त्यांच्या मधे निरागसकता टिकून राहिली आहे. हि सर्व मुले म्हणजे माडिया गोंड आदिवासी समाजातील विद्यार्थी. यांच्या विषयी पुस्तकामधे वाचले असेल किंवा हेमलकसा वरच्या माहितीपटा मधे तुम्ही पाहिलं असेलच. 
याना असं मैदानावर पाहताना त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता कॅमेरा मधे टिपायचा मोह मला आवरला नाही.

हेमलकसा मधला पहिला दिवस प्रकल्प पाहण्यात आणि इथल्या कार्यकर्त्याच्या भेटीमधे आणि गप्पांमधे गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता वॉल पैंटिंगच्या कामाला सुरवात केली, त्यादिवशी शनिवार असल्याने तेथील विद्यार्थ्यांना दुपारनंतर सुट्टी होती. म्हणून विद्यार्थ्यांना घेऊन वॉल पैंटिंग आम्ही करणार होतो. आम्ही चित्रे काढत असताना काही विदयार्थी तेथे आले, त्यांनीही आमच्या बरोबर चित्रे काढायला सुरवात केली. सर्वांचा चेहऱ्यावरचा उत्साह आणि चिकाटी वाखाणण्याजोगी होती. सकाळी १० वाजता केलेली सुरवात ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच पर्यंत सलग १९ तास या भिंतीचे रंगवण्याचे काम चालले, मुलेही रात्री १० पर्यंत चित्रांमध्ये रंग भरण्यात व्यस्त होते,  सर्व मुले-मुली रंगवताना चित्रांमध्ये गुंतली होती अगदी स्वतःच्याच  जगात, फोटो मधे दिसेल तुम्हाला. 


आकाश, नम्रता, वैभव, सिमरन, राधा अशा कमीत कमी ३० जणांचा यात सहभाग होता.एकूणच खूप मित्र-मैत्रिणी झाल्या या भिंतीमुळे, निर्मितीचा आनंद निराळाच त्यामुळे त्यांचे या भिंतीशी एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. त्यांच्याकडे त्यांच्यासाठी आयुष्यभर पुरणारी एक प्रेरणा किंवा आठवण मिळाली, का कुणास ठाऊक पुढे चालून माझ्यासारख्याला जगणं शिकवतील. 

वॉल पैंटिंगसाठी संधी दिल्या बद्दल अनिकेत दादा आणि  समीक्षा ताई यांचे खूप खूप आभार. 

आमचे वॉल पैंटिंगचे काम संपल्यावर सकाळी ६: ३० च्या बस ने परतीच्या प्रवासाला जायचे ठरले होते. पहाटे  ५ वाजता काम संपल्यावर आम्हाला विलास मनोहर यांनी बनवलेला चहा प्यायला मिळाला. हो तेच विलास मनोहर ज्यांचे " मला न कळलेले बाबा" हे बाबा आमटे यांच्या वर लिहिलेले पुस्तक   "नेगल" ,"नेगल (भाग २) : हेमलकशाचे सांगाती" , "एका नक्षल वाद्याचा जन्म"  या पुस्तकाचे लेखक. बाबा आमटे याच्याविषयीची खूप माहिती व त्याच्या काही कवितांची ओळख  मला "मला न कळलेले बाबा" या पुस्तकातून झाली, अगदी बाबा आमटे-आनंदवन यांच्याशी जोडला गेलो तो या पुस्तकामुळेच . खूपच प्रेणदायी पुस्तक आहे हे. माझा स्वतः बद्दलचा दृष्टिकोन खूपच बदलत  गेला. त्यामुळे एक वेगळाच आदर त्यांच्याबद्दल आहे. अतिशय गोड माणूस, तस त्यांना मी हेमलकसा वरील माहितीपटात पहिले होते आणि त्यांची पुस्तके वाचली होती म्हणून त्यांचं बोलणं ऐकताना असं कधीच वाटले नाही कि या व्यक्तीला आपण आज भेटतोय, पुस्तकामधून संवादाला सुरवात झाल्यामुळे असे झाले असावे. बोलताना अगदी लगेच कनेक्ट झालो. आकाशापर्यंत पोचलेली आणि जमिनी वर पाय ठेवून वावरणारी माणसं, यांच्याविषयी काय लिहिणार. रोज आपण २ पायाच्या प्राण्यांमधे आणि सिमेंटच्या जंगलात वावरतो आणि अचानक एखाद्यादिवशी अशी माणसं भेटतात. जगायला एक वेगळीच दिशा देतात. म्हणजेच दुसऱ्यासाठी आनंद शोधता शोधता स्वतः मधे आनंद शोधण्याची किंवा जगण्याची कला नकळत शिकवून जातात.
तो पहाटे ५;३० वाजता त्यांनी बनवलेला चहा आयुष्यभर कामामधे  उत्साह आणणारा आणि इतरांसाठी काहीतरी करण्यासाठी एक  प्रेरणादायी आठवण म्हणून राहणार आहे. 
 - प्रमोद ( धागा कार्यकर्ता  )

Wednesday, February 1, 2017

जेव्हा आपण प्रेम करतो

जेव्हा आपण प्रेम करतो,
तेव्हा आपल्या शर्टाला खिसा नसतो.
आपण असतो कोणी अनोखे
 जादूगार, कंडम बरगडय़ांत,
गंध उतू जाणारी फुलबाग फुलविणारे.

मग पुढे जीभ भाजते, ओठ करपतात.
तोंडात दाटून येते कडू द्वेषाची थुंकी,
पण तो थुंकत नाही जगावर.
एकदा तरी गिळून टाकतो समजुतीने.
कारण तिने शिवले असतात तिच्या
 राजाचे दोनच फाटलेले शर्ट पुन:पुन्हा
 आणि तिच्या ठिगळ लावलेल्या पदराने
 त्याने सांधले असते एक आभाळ
 - मंगेश पाडगांवकर