Amazon

Monday, April 21, 2014

"बाळा तुझे नाव नाही सांगितलेस"?

"बाळा तुझे नाव नाही सांगितलेस"?
टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५
वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग!
पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे
आवाज येतच होते.
कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं
ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच
ऐकलं नव्हतं!!"
त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!"
तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!"
यावर चौथा, "हो ना, वाटतंय
की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच
अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून
ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!"
लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती.
होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले
आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल
संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची!
अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर
फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा,
तशी त्यांची नजर मघाशीच्या "त्या" मुलावर अडली! एक नि:श्वास
सोडून ते बोलू लागले,
"आमच्यावेळी अश्या स्पर्धा फारश्या होत नसत. पण
जेव्हा व्हायच्या, त्यावेळी आम्ही अतिशय उत्साहाने भाग घ्यायचो.
चार-चार दिवस खपून स्पर्धेची तयारी करायचो आणि बेधडक
बोलायचो! आजदेखील सर्वांचीच भाषणे उत्तम झाली. साजेशी झाली.
परंतू हल्ली काही मुलांमध्ये आळस फार भरलाय. वक्तृत्वस्पर्धे
तली भाषणे पालकांकडून लिहून घेऊ लागलीयेत ती मुलं. पाठ केलेलं
उसनवार भाषण म्हणून टाळ्या मिळवल्या जातायत.
आमच्या अनुभवी नजरेतनं अश्या हुशाऱ्या सुटत नाहीत. इतक्या लहान
वयात इतके प्रगल्भ विचार कुणी मांडूच शकत नाही, हे लागलीच
लक्षात येते. पण काय करणार? स्पर्धेचे नियम आहेत. काही बंधनं
आहेत. ती पाळण्यासाठी मला अश्याच एका मुलाला प्रथम क्रमांक देणं
भाग पडतंय. पण माझी अशी इच्छा आहे की, इथून पुढे त्याने
स्वत:हून तयारी करून स्पर्धेत उतरावे. भले साधेच भाषण करावे, पण
स्वत:चे करावे".
बोलता बोलता त्यांनी "त्या" मुलाच्या दिशेने हात केला, "बाळ पुढे
ये.."
सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. त्याची चर्या शांत होती.
परंतू नीट पाहिले असते तर त्याच्या कानांच्या पाळ्या लाल
झालेल्या दिसल्या असत्या, नाकपुड्यांची थरथर जाणवली असती! पण
टाळ्यांच्या गजरात अश्या सूक्ष्म तपशीलांकडे कुणाचे लक्ष जाते?
तो पुढे आला. अध्यक्ष महोदयांनी त्याच्या हातात प्रथम क्रमांकाचे
बक्षिस दिले. पुन्हा एकवार टाळ्यांचा कडकडाट झाला. आवाज
जरासा थांबल्यावर "त्या"ने अध्यक्षांच्या दिशेने पाहिले
आणि मनातली खळबळ आवाजात किंचितही जाणवू न देता म्हणाला,
"महोदय, आपली काही हरकत नसेल तर मी थोडंसं बोलू का"?
"अवश्य! बोल ना.."
बक्षिसपत्र बाजूला ठेवले आणि पुन्हा एकवार तो व्यासपीठावर जाऊन
उभा राहिला. सभागृहात टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील
अशी शांतता पसरली. सगळ्यांचे लक्ष "तो" काय बोलतो याकडे
लागलेले. खोल श्वास घेऊन तो बोलू लागला,
"मला पारितोषिक मिळाले हा माझा सन्मान आहे. त्याबद्दल
मी सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धेचे संयोजक आणि उत्तम श्रोतागण
यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रथमत:च कृतज्ञता व्यक्त करतो".
क्षणभर थांबला. पण पुन्हा निर्धारपूर्वक बोलू लागला,
"परंतू मा. अध्यक्ष महोदयांना वाटते की, ते भाषण मी लिहिलेले
नाही - पालकांनी लिहून दिलेय. ते म्हणतात की, इतक्या लहान वयात
इतके प्रगल्भ विचार कुणी कसे मांडू शकेल? मी त्यांना विचारू
इच्छितो की अध्यक्ष महोदय, तुम्ही उद्या संतश्रेष्ठ
ज्ञानेश्वरांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचून
ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असाच कोटीक्रम लावणार आहात काय?
ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नसून ज्ञानेश्वरांच्या आई-
अण्णांनी त्यांना लिहून दिलीये - कारण इतक्या लहान मुलाला असे
प्रगल्भ विचार सुचणेच शक्य नाही - असेच म्हणणार आहात काय"?
अवघी सभा दचकली. "त्या"ने अध्यक्षांकडे एक कटाक्ष
टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली,
"तरीदेखील अध्यक्ष महोदयांना शंका असेल तर
मी संयोजकांना विनंती करतो की, मला याच क्षणी -
आत्ताच्या आत्ता वक्तृत्वासाठी एखादा विषय
द्या आणि तयारीसाठी घटकाभराचा वेळ द्या. आणि मी माझा अभ्यास
पणाला लावून त्याही विषयावर भाषण करून दाखवतो की नाही पहाच!
मगच ते बक्षिस मला द्यायचं की नाही ठरवा"!!
अभावितपणे कुणीतरी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि पाहाता-
पाहाता सारे सभागृह पुन्हा एकवार टाळ्यांच्या गजराने कुंद होऊन गेले.
इतका वेळ धीराने बोलणारा "तो" आता मात्र घाबरला. आपण चुकून
या व्यासपीठाच्या मर्यादेचा भंग तर नाही ना केला? एवढे विद्वान
अध्यक्ष महोदय, पण आपल्या या उद्धट वर्तनाने चिडले तर नसतील
ना? त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिले.
त्यांची नजर स्थिर होती. परंतू सूर्य उगवण्यापूर्वी नभांत
जशी हळूवार लालिमा चढत जाते, अगदी तश्याच हळूवारपणे
त्यांच्या चर्येवर हास्यप्रभा फाकू लागली होती! शांत चेहऱ्याचे रुपांतर
हळूहळू प्रसन्नतेत झाले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी त्याला जवळ
येण्याचा इशारा केला. तो अवघडून आला तर त्यांनी त्याला मिठीच
मारली. त्याच्या पाठीवर थाप देत ते बक्षिसपत्र - "काळ"
या गाजणाऱ्या नियतकालिकाचे वर्षभराचे मोफत सभासदत्व -
त्याच्या हाती दिले.
म्हणाले, "बाळा तू आज माझे डोळे उघडलेस. विद्वत्ता,
बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या मेहनतीवर
आणि अभ्यासावर अवलंबून असते, हे तू आज मज
पढतपंडिताला दाखवून दिलेस. या बक्षिसावर अधिकारच आहे तुझा.
फक्त तुझा!!"
सारी सभा अवाक होऊन पाहात होती. तो आनंदाने उत्साहित होऊन
व्यासपीठावरून उतरला. गर्दीतून वाट काढत जाऊ लागला.
तेवढ्यात अध्यक्षांनी हाक मारली, "अरे बाळा, मला तुझे नाव
नाही सांगितलेस"?
हाक ऐकताच तो थबकला. वळाला. त्याची छाती अभिमानाने फुलून
आली होती. त्याने मान उंचावली आणि म्हणाला,
"माझं नाव सावरकर.. विनायक दामोदर सावरकर"!!!